जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा ; पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देत केली पाहणी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी तसेच पेट्रोल-डिझेल पुरवठादार यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधनसाठा, पुरवठा व्यवस्था आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देत केली पाहणी
अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी इंधनसाठा, पुरवठा व्यवस्था आणि नागरिकांची गर्दी याची माहिती घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जळगाव जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नाही. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून अतिरिक्त साठादेखील ट्रान्झिटमध्ये असल्याने पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात एकूण ३७१ पेट्रोल पंप असून काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात साठा कमी झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र संबंधित पंपांवर तातडीने नवीन साठा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका”
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांमुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भीतीपोटी अतिरिक्त इंधनसाठा करू नये, वाहनांच्या रांगा लावू नयेत तसेच कॅनमध्ये इंधन भरून नेऊ नये, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.प्रशासनाच्या माहितीनुसार, HPCL, BPCL, IOCL, नायरा आणि रिलायन्स या कंपन्यांकडून नियमित इंधन पुरवठा सुरू असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. संबंधित यंत्रणेमार्फत परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
अफवांमुळे वाहतूक कोंडी तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना काही तक्रार अथवा शंका असल्यास ०२५७-२२२३१८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









