हत्या प्रकरणानंतर विभागीय चौकशीत गंभीर हलगर्जीपणा उघड; कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश
बोदवड ( प्रतिनिधी ) – तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर बोदवड पोलीस ठाण्यातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी तीन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर, एएसआय रविंद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. विभागीय चौकशीत बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर वादप्रकरणात दोन्ही गटांमधील वाढता तणाव वेळेत नियंत्रणात आणण्यात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच पुढे हत्या सारखी गंभीर घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे दोन्ही पक्षांतील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी प्रकरणाची गंभीरता दुर्लक्षित करून आवश्यक चौकशी तसेच कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील तणाव अधिकच वाढत गेला.
दरम्यान, बोदवड शहराचे टाऊन बीट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ यांनाही परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. १९ मे २०२६ रोजी दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणून कोणतीही कठोर कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. त्याचवेळी कठोर प्रतिबंधात्मक पावले उचलली असती तर पुढील गंभीर घटना टाळता आली असती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना फोन व व्हॉट्सअॅपद्वारे वादाची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. स्थानिक नगरसेवकांनीही परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात आणून दिली होती. मात्र, त्यांनी स्वतः कोणतीही कारवाई केली नाही तसेच अधीनस्थ कर्मचाऱ्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले नाहीत. याशिवाय वरिष्ठ अधिकारी व कंट्रोल रूमलाही वेळेत माहिती न दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
तीन्ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियता आणि निष्काळजीपणामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आणि अखेर हत्या सारखी गंभीर घटना घडल्याचा ठपका विभागीय अहवालात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तिघांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.









