जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ते संभाजीनगर मार्गावरील उमाळा घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फर अली सय्यद बाबन अली (रा. गुलशन रजा कॉलनी, आझाद नगर, जळगाव) हे पत्नी ताहेराबी मुजफ्फर अली सय्यद यांच्यासह २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच १९ ईजे ३८९२ क्रमांकाच्या ज्युपिटर दुचाकीने प्रवास करीत होते.
जळगाव ते संभाजीनगर रोडवरील उमाळा घाटाच्या उतारावर वाहन चालवत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगामुळे दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळून थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात मुजफ्फर अली सय्यद व त्यांच्या पत्नी ताहेराबी यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गुलाम अली सय्यद मुजफ्फर अली सय्यद (वय ३८, रा. गुलशन रजा कॉलनी, आझाद नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०६(१), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.









