खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३ तरुणांवर गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) : शहरातील मेहरुण तलाव परिसरात ‘तुम्ही कोठले आहात’ असे विचारल्याचा राग आल्याने तीन तरुणांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सागर मच्छिंद्र शेले (वय २१, रा. गणेश कॉलनी) हे २६ एप्रिलच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र चेतन सोनवणे, प्रमोद जाधव, राहुल सोनवणे आणि प्रेम पारधी यांच्यासोबत मेहरुण तलावाच्या ट्रॅकवर फिरत होते. यावेळी तिथे उभे असलेले संशयित आरोपी विक्रांत वासुदेव राणे, मोहित अशोक महाजन (दोघे रा. खेडी) आणि निलेश रमेश सपकाळे (रा. रामपेठ, जुने जळगाव) यांना राहुल सोनवणे याने “तुम्ही कोठले आहात? इकडे कशाला फिरता?” अशी विचारणा केली. या साध्या विचारणेचा संशयितांना इतका राग आला की त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यावर संशयित विक्रांत राणे याने त्याच्या खिशातील बटनचा चाकू काढून राहुल सोनवणे याच्या मानेवर आणि डोक्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले फिर्यादी सागर शेले आणि त्यांचा मित्र चेतन सोनवणे यांच्यावरही विक्रांतने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी सागर शेले यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. गणेश वाघमारे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे मेहरुण तलाव परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.









