
शांततेत पार पडला जनआवाज
भडगाव (प्रतिनिधी) – देशभर सुरू असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ला प्रतिसाद देत भडगाव शहरात सोमवारी ‘गोमाता सन्मान शोभायात्रा’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा मिळावा, तसेच तिचे संरक्षण, संवर्धन आणि सन्मान सुनिश्चित व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत जनजागृतीचा संदेश दिला.
या शोभायात्रेचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या पुढाकारातून करण्यात आले होते. यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.), बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. शहरातील बाजार चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा शिवाजी महाराज चौक मार्गे भडगाव तहसील कार्यालयापर्यंत शांततेत पोहोचली. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सहभागी कार्यकर्त्यांनी गोसंवर्धन, गोहत्या बंदीची कडक अंमलबजावणी, तसेच गोशाळांना शासकीय मदत वाढविण्याच्या मागण्या मांडल्या. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत गोमातेच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
शोभायात्रेच्या शेवटी भडगावचे नायब तहसीलदार अनिल भामरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गोमातेला सन्मानाचे स्थान मिळावे, तिच्या संरक्षणासाठी कठोर कायदे व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच जनजागृती मोहिमा राबविण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाला भद्रा माळी, नाना हडपे, साजन पाटील, मयूर मालपुरे, श्याम मुसंडे, रवींद्र पाटील, रोहित भाई, चेतन पाटील यांच्यासह भडगाव शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांततेच्या मार्गाने आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण ठेवत पार पडलेल्या या शोभायात्रेमुळे शहरात सामाजिक एकात्मतेचा संदेशही दिला गेला. आयोजकांनी पुढील काळातही अशा जनजागृती मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.









