मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज हतनूर धरणाला भेट देत धरणातील जलसाठा, पाण्याची आवक, विसर्ग व्यवस्था तसेच संभाव्य पूरस्थितीचा सखोल आढावा घेतला.
यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता शशिकांत चौधरी यांनी धरणातील सध्याचा जलसाठा, तापी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह, विसर्गाचे नियोजन आणि धरणाच्या कार्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी धरणावरील नियंत्रण कक्ष, यांत्रिक प्रणाली, गेट्सची कार्यप्रणाली तसेच विविध तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. धरण परिसराची पाहणी करत त्यांनी नदीच्या पाणीपातळीचाही आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी धरण परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाण्याचा विसर्ग वाढविण्याची वेळ आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासन व नदीकाठच्या गावांपर्यंत पोहोचविणे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे, तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले.









