साडेतीन वर्षांपासून फरार दांपत्य पोलिसांच्या हाती लागेना, फिर्यादीची एसपींकडे धाव
जळगाव (प्रतिनिधी):- शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींमध्ये एक भोंदू बाबा आणि त्याची पोलीस दलात कार्यरत असलेली पत्नी यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटली तरी आरोपी अद्याप मोकाट असल्याने पीडितेने जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी लावली आहे.

मैत्रीचा फायदा घेत रचला जाळा
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा उर्फ मनोरमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडित महिलेच्या घरात सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत महिमा पाटील हिने आपला पती ललित पाटील याच्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे भासवले. “पतीकडे उपाय असून घरातील भांडणे थांबवून सुख-शांती मिळेल,” असे आश्वासन तिने दिले.
स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि गुप्तधनाचे आमिष
भोंदू बाबा ललित पाटील याने पीडितेच्या मनात भीती निर्माण केली. “तुझ्या दिराच्या आत्म्याने घरात प्रवेश केला असून तुझ्यावर करणी करण्यात आली आहे,” असे सांगून त्याने अघोरी विधी सुरू केले. फसवणुकीचा हा सिलसिला केवळ जळगावपुरता मर्यादित राहिला नाही. आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर येथे नेऊन बनावट अघोरी पूजा केल्या. उज्जैन येथे तर थेट स्मशानभूमीत विधी करून लाखो रुपये उकळले.
बाहेरून कर्ज काढून पीडितेने सुमारे ११ ते १२ लाख रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात दिले. मात्र, कोणताही फरक पडत नसल्याचे पाहून जेव्हा तिने पैसे परत मागितले, तेव्हा ललित पाटील याने “मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुझ्या सात पिढ्यांचा नाश करेन,” अशी धमकी दिली.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह?
या प्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिमा पाटील ही मुंबईतील भांडुप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे पोहोचले होते, मात्र ती मिळून आली नाही. साडेतीन वर्षे उलटूनही आरोपी अद्याप फरार आहेत. “आरोपी स्वतः महिला पोलीस कर्मचारी असल्यानेच तपासात दिरंगाई होत आहे,” असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.
आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळावी आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी पीडितेने आता पोलीस अधीक्षकांचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणाने जळगाव पोलीस दलात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.









