अवैध वाळू उपशामुळे जीव गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप
चाळीसगाव (प्रतिनिधी):- आव्हाणे येथील ४५ वर्षीय तरुण संजय मणिलाल पाटील यांचा गिरणा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे आव्हाणे परिसरात शोककळा पसरली असून, नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे गवंडी कामावर मजूर म्हणून कार्यरत होते. ३ मार्च रोजी धरणगाव तालुक्यातील एका गावात काम आटोपून ते पायी आपल्या आव्हाणे गावाकडे परतत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्र ओलांडत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात बुडाले. नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही बाब लक्षात येताच तातडीने धाव घेत संजय यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.
मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, १० वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे. आव्हाणे परिसरात गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असतो. या बेसुमार उत्खननामुळे नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल आणि धोकादायक डोह तयार झाले आहेत. या डोहाचा अंदाज न आल्यानेच संजय यांचा पाय घसरून मृत्यू झाला, असा संतप्त आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने या अवैध उपशाकडे लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.









