डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञांकडून वृद्ध महिलेवर संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण यशस्वी
जळगाव (प्रतिनिधी):- अकोला जिल्ह्यातील ७८ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात संपूर्ण गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तीव्र गुडघेदुखी व चालण्यास होणारा त्रास सहन करत असलेल्या या वृद्ध महिलेसाठी ही शस्त्रक्रिया मोठा दिलासा ठरली आहे.याबाबत माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातील शिरसोली येथील ७८ वर्षीय मनुताई गिर्हे या महिलेला दीर्घकाळापासून गुडघ्यांमध्ये असह्य वेदना होत होत्या. सुरुवातीला घरगुती उपचार, वेदनाशामक औषधे तसेच स्थानिक पातळीवर विविध उपचार करून पाहण्यात आले. मात्र वाढते वय, झिजलेले गुडघे आणि वेदनांची तीव्रता यामुळे चालणेही अत्यंत कठीण झाले होते. संधीवाताच्या त्रासामुळे हाडे ठिसूळ झाली होती. त्यामुळे दैनंदिन कामकाज, घरातील हालचाली आणि सामाजिक जीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. योग्य उपचाराच्या शोधात संबंधित महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी नागपूर तसेच संभाजीनगर येथील नामांकित रुग्णालयांमध्येही धाव घेतली. मात्र वय जास्त असल्याने शस्त्रक्रियेबाबत जोखीम असल्याचे सांगत काही ठिकाणी शस्त्रक्रिया टाळण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे उपचाराचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला. डॉ. उल्हास पाटील रूग्णालय आशेचा किरणअखेर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांच्याकडून महिला रूग्णाची सखोल तपासणी करण्यात आली. आधुनिक तपासण्या, एक्स-रे आणि वैद्यकीय चाचण्यांनंतर रुग्णाच्या गुडघ्यांमध्ये तीव्र ऑस्टिओआर्थरायटिस असल्याचे निदान झाले. औषधोपचार निष्फळ ठरत असल्याने संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचा निर्णय वैद्यकीय पथकाने घेतला. रुग्णाचे वय लक्षात घेता ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. मात्र अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी आपल्या दीर्घ अनुभव, कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. वेदांत पाटील, डॉ. सुमित भोसले यांच्यासह स्टाफने सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांत रुग्णाच्या वेदनांमध्ये लक्षणीय घट झाली असून फिजिओथेरपीच्या मदतीने त्या हळूहळू चालण्यास सक्षम होत आहेत. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च लागणार होता. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.वय जास्त असले तरी योग्य तपासणी, नियोजन आणि अनुभवी टीम असल्यास टोटल नी रिप्लेसमेंट सुरक्षितपणे करता येते. या रुग्णासाठी चालणे पुन्हा शक्य करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट होते. रुग्णाची इच्छाशक्ती आणि कुटुंबीयांचे सहकार्य यामुळे उपचार अधिक सुलभ झाले.डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांमुळे जळगाव व खानदेशासह विदर्भातील रुग्णांनाही आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज उरलेली नाही.

– डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.









