वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्वच्छतागृहाचे लोकार्पण
जळगाव (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत हे गाव विकासाचे मंदिर असून गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दि. १७ सप्टेंबर रोजी ते २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या काळात ‘सेवा पंधरवडा’ राज्यभर राबविला जात आहे. या निमित्ताने वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला-पुरुषांसाठी बांधलेले स्वच्छतागृह यांचे लोकार्पण, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महिलांनी लहानमोठे उद्योग उभे करून ‘लखपती दीदी’ व्हावे. मंत्रिपदाची गरिमा जपत मी आपला भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडत असतो. गावोगावी केलेल्या विकासकामातून मिळणारे प्रेम मी कधीही विसरणार नाही असे भावनिक उदगार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महापौर विष्णू भंगाळे होते. कार्यक्रमात, सेवा पंधरवडा निमित्त गावातील पात्र व गरजू व्यक्तींना रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र अश्या विविध लाभांचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप सुरळकर यांनी केले तर सूत्रसंचालन बी. बी. धाडी यांनी केले. आभार विकास जाधव यांनी मानले. या वेळी सरपंच कविताबाई सपकाळे, तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, दूध संघ संचालक रमेश पाटील,ग्रामसेवक नारायण खोडपे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या महिला, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.