शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा


महिलेसह कुटुंबीयांना मारहाण; सोन्याचे दागिने तुटून नुकसान, जीवे मारण्याची धमकी
पाचोरा : मागील भांडणाच्या कारणावरून शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगाव (ता. पाचोरा) येथे दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी सरपंचासह सुमारे ४५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत महिलेसह तिच्या कुटुंबीयांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शेळ्यांचे शेड तोडल्याचा आरोप
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, रूपाली खुशाल पाटील (वय २५, रा. दामजी नगर, पाचोरा) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता जारगाव येथे आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तक्रारदाराच्या घोड्यांना बांधण्यासाठी असलेल्या शेडमधील दोर कापून घोडे सोडून दिल्याचा आरोप आहे.तसेच जेसीबी मशीनच्या साहाय्याने पत्री शेड तोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार आणि त्यांचे पती खुशाल सुधाकर पाटील यांनी शेड तोडू नये, अशी विनंती केली असता वाद आणखी चिघळला.
पतीवर काठीने हल्ला
यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या पतीला काठी व रॉडने मारहाण केली. मारहाणीत ते बेशुद्ध झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांना वाचवण्यासाठी तक्रारदार आणि त्यांची आजी-सासू गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.यावेळी आरोपी भावेश सुनील पाटील याने तक्रारदाराच्या पोटात लाथ मारल्याचे, तर सुनील सरपंचाने तक्रारदाराच्या डोक्याचे केस धरून ओढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तक्रारदाराच्या आजी-सासूला चापट व पायाने मारहाण केल्याचा आरोप आहे.
सोन्याचे दागिने तुटून नुकसान
मारहाणीच्या वेळी तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढल्याने त्यातील दोन सोन्याचे पोहे तुटून पडले आणि नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तक्रारदार, त्यांचे पती, सासरे आणि लहान मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या कामासाठी येणारे संकेत गोकुळ धनगर आणि रोहन कालिदास नेतकर यांनाही आरोपींनी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विविध कलमांन्वये गुन्हा
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ११५(२), ३२४, ३५१(२) आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सरपंच सुनील पाटील, भावेश सुनील पाटील, मोट्या प्रताप पाटील यांच्यासह जारगाव येथील इतर सुमारे ४० ते ४५ जणांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार संजय माधव काळे करीत आहेत.








