तक्रारी निवारणासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट गतिमान प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण तसेच ग्रामिण भागातील नागरिकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावणे असा आहे. या अभियानाअंतर्गत जळगाव तालुक्यातील ग्रामिण भागात शिबीरे भरविण्यात येणार आहेत.
नशिराबाद येथे न्यु इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालय येथे दि. १२ जून रोजी सकाळी १० वाजता तर शिरसोली येथे दुर्वांकुर लॉन्स, शिरसोली रोड येथे दि. १३ जून रोजी सकाळी १० वाजता शिबीर सुरु होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. या शिबीरात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचे विविध प्रश्न, तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी महसूल विभागासह शासन निर्णयातील संबंधित विभाग सहभागी होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या आणि अडचणी सोडवाव्यात, असे आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.