नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लॉकडाउनमुळे देशात अर्थचक्र ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांना झळ बसली आहे. त्याचबरोबर छोटे व मध्यम उद्योग बंद पडू लागले आहे. देशभरात सायकल उत्पादक कंपनी एटलासही बंद पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यावर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी चिंता व्यक्त केली आहे.
देशातील प्रमुख सायकल उत्पादक कंपनी म्हणून एटलास देशभरात प्रसिद्ध आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कंपनीला मोठा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. भांडवलाअभावी कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असून, बीएसपीच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची चर्चा केली जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील एटलाससारखी प्रमुख सायकल उत्पादक कंपनी पैशाअभावी बंद होत असल्याचे वृत्त चिंता वाढवणारे आहे. सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावं, असं मायावती यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
लॉकडाउननंतर देशभरात विविध ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचा रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला. लॉकडाउन लागू झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. रोजगार बंद झाला. त्यामुळे लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतरण केले. या काळात उत्तर प्रदेश सरकारनं मजुरांना सीमेवरच रोखले होते . त्यावरही मायावती यांनी भाष्य केले . उत्तर प्रदेशात घरवापसी करणाऱ्या लाखो मजुरांपैकी ३ टक्के मजूर करोनाबाधित आढळून आले आहे. ही खूप मोठा दिलासा देणारी बाब आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा राज्यात करोना प्रसारासाठी या मजुरांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शंकेमुळे या मजुरांच्या घरवापसीसाठी विलंब केला जात होता, असे मायावती यांनी म्हटले आहे.