पुणे ( प्रतिनिधी ) – संत तुकाराम महाराज पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थानापूर्वी चांदीच्या रथाला चकाकी देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर पालखी पंढरपूरकडे जाणार आहे. अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथील घनश्याम गोल्ड्स यांच्याकडून ही सेवा दिली जाते. वारी परंपरा ही जातीपाती आणि धर्माच्या पलीकडचा धार्मिक सोहळा आहे. नेमका हाच सौहार्द रथाच्या चकाकीच्या कामातही पाहायला मिळत आहे. कारण रथाची चकाकी देण्याचे काम मुस्लीम कारागीर मोठ्या श्रद्धेन करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 जूनला पुण्यातील देहू नगरीत येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे, म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.