नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडे नऊ कोटींहून अधिक शेतकर्यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ अंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक आधार दिला. भारताचं अद्यापही करोनाशी युद्ध सुरू असून आपण हे युद्ध लढणार आणि जिंकणारही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
कोविड रुग्णांचं दु:ख, वेदना मी समजू शकतो. आपली लढाई एका अदृश्य शक्तीसोबत आहे. या कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. नागरिकांना जे दु:ख झालं. जे दु:ख अनेकांनी अनुभवलं आहे, मी ते दु:ख समजू शकतो, असं मोदी म्हणाले.
भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यासोबतच नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही केलं. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आत्तापर्यंत देशात आत्तापर्यंत 18 कोटी लोकांनी लस घेतल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
करोना लस हे करोनाविरूद्ध संरक्षणाचं एक महत्त्वाचं साधन आहे. देशभरातील शासकीय रुग्णालयांत मोफत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा क्रमांक येईल तेव्हा लस नक्की घ्या. लस आपल्याला कोरोनापासून संरक्षण प्रदान करू शकेल आणि गंभीर आजाराचा धोका कमी होईल असे मोदी यांनी म्हंटल.