औरंगाबाद (वृत्तसंस्था) – राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. नुकतंच वंचित बहुजन आघाडीकडून या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

यात औरंगाबाद, पुणे आणि नागपूरच्या पदवीधर निवडणुकांसाठी वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी वंचितने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
पदवीधर मतदारसंघ – औरंगाबाद – नागोराव पांचाळ, पुणे – सोमनाथ साळुंखे, नागपूर – राहुल वानखेडे, शिक्षक मतदारसंघ, पुणे – सम्राट शिंदे
दरम्यान नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे.
तर भाजपकडून नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.
राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे







