पाचोरा ( प्रतिनिधी ) — पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोकणधर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आ.किशोर पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मदतीसाठी साकडे घातले.
मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेल्या जनतेला यातून दिलासा देण्यासाठी शासनामार्फत भरपाई द्यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितुर आणि गढद नदीला महापुर येवुन पाचोरा तालुक्यातील ११ तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले दोन्ही तालुक्यात सुमारे ६० घरांची पडझड झाली असून अनेक घरांचे लहानमोठे नुकसान झोले आहे सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला आहे.
पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावाचा संपर्क तुटला होता. नगरदेवळा, कजगाव येथील पुलही वाहुन गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक गावात इलेक्ट्रीक तारा तुटुन व विजेचे खांब पडल्याने विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ.किशोर पाटील यांनी प्रशासनाला दिले होते. प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल यांनी संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर केला होता.