नवी दिल्ली ;– भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून आज 606 पर्यंत पोहचली असली तरी त्यापैकी 42 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे झाल्याची दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात देण्यात आली आहे.
एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या आकड्यातून उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची 42 ही संख्या वजा केली असता देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 553 असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 42 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत भारतात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेकांना अन्य आजारही होते. कोरोनामुळेच त्यांचा मृत्यू झाला असे ठामपणे म्हणता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना हा जीवघेणा आजार असून कोरोना झाला म्हणजे मरण जवळ आले, हा गैरसमज दूर करणारी ही आकडेवारी आहे. कोरोना झाला तरी योग्य उपचाराने तो पूर्ण बरा होऊ शकतो, हे 42 उदाहरणांसह स्पष्ट झाले आहे.
कोरोनामुळे घाबरून जाऊ नका, कोरोना बरा होऊ शकत असला तरी त्याची बाधा होऊ म्हणून प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा प्रसार वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशाचे पालन करावे. 21 दिवस घरी थांबून कोरोनाला हरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.