जळगाव (प्रतिनिधी) – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटना भाजप सरकारचे अपयश दाखवत असून याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपणे, ते दडपता आले नाही म्हणून त्यांच्या अंगावर कार चालविणे असा घृणास्पद प्रकार भाजपच्या मंत्रीपुत्राने आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असून जिल्ह्यातील युवासेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, सोमवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील युवासेनेने केले आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना ज़िल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, युवासेना उप जिल्हा अधिकारी पियुष गांधी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लखीमपूर खिरी येथे शेतकरी बांधव त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. मनमानी कारभार चालविण्याची भाजपाची वृत्ती उत्तर प्रदेशातदेखील कायम आहे. लखीमपूर खिरी येथे न्याय मागण्याऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चर्चा न करता थेट त्यांच्या अंगावर चारचाकी वाहन चालविली. त्यात ८ शेतकरी शहिद झाले, असेही पियुष गांधी यांनी सांगितले. घटनेचा तीव्र निषेध युवासेनातर्फे नोंदविण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा बंद यशस्वी करण्यासाठी युवासेना देखील नागरिकांना आवाहन करीत आहे.