जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार डॉ. विनोद पाटील यांनी बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांच्या कडून स्वीकारला.
डॉ. विनोद पाटील हे विद्यापीठाचे सातवे नियमित कुलसचिव ठरले आहेत. १० मार्च रोजी गणितशास्त्र प्रशाळेतील प्रा. किशोर पवार यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. जुलै महिन्याअखेर कुलसचिव पदासाठी झालेल्या मुलाखत प्रक्रियेद्वारे डॉ. विनोद पाटील यांची कुलसचिव पदी निवड झाली होती. बुधवारी प्रा. किशोर पवार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठातील सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. माहेश्वरी यांनी प्रा. किशोर पवार यांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच डॉ. विनोद पाटील यांना उत्तम कामासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. पवार यांनी विद्यापीठातील सर्व घटकांनी सहकार्य केल्यामुळे चांगले काम करता आले असा उल्लेख आपल्या मनोगतात केला. तर नुतन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी याच विद्यापीठाचा विद्यार्थी, त्यानंतर याच विद्यापीठात तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून काम केले आणि आज कुलसचिव पदापर्यंत पोहचलो याचा आनंद असल्याचे सांगितले. हे विद्यापीठ आपल्याला पूर्ण परिचयाचे असल्यामुळे या पदाला पूर्णत: न्याय देणार असल्याचे सांगून सर्व घटकांचे सहकार्य मिळेल अशी खात्री बोलून दाखविली.
डॉ. विनोद पाटील यांची मूळ अस्थापना याच विद्यापीठाची असून साडे तीन वर्षापूर्वी मुंबई विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली होती. याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात काही महिने प्रभारी कुलसचिव म्हणून काम केले. त्या आधी दहा वर्षांपूर्वी डॉ. पाटील यांनी मुंबई विद्यापीठातही काही काळ उपकुलसचिव म्हणून काम केलेले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहायक पूर्वलेखक, पध्दती विश्लेषक, प्रभारी संगणक प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा २३ वर्षाचा अनुभव आहे.