जळगावातील मेहरूण भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मेहरुण गावात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे आढळून आल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून या शर्यतीचे आयोजन करण्यासाठी किमान पंधरा दिवसाअगोदर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी घेणे अपेक्षीत आहे. मात्र आयोजकांनी तसे न करता मेहरुण गाव शिवारातील उजाड कुसुंबा येथे शुक्रवार (ता.१६) रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीसाठी साठ स्पर्धकांनी आपापल्या बैलजोडीसह गाड्या सहभागी केल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शर्यतींचे उद्घघाटन करण्यात येऊन बैलगाडा शर्यत बघण्यासाठी हजारोंचा जमाव लोटला होता.
पशू वैद्यकीय अधिनियमानुसार आजवर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यावर बंदी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना व नियमांचे अनुपालन अपेक्षित आहे. वीस वर्षानंतर अशा प्रकारच्या शर्यतीचे जळगाव शहराजवळच कुसुंबा येथे आयेाजन करण्यात आले होते. शर्यत संपल्यावर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी डॉ.गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तसेच शर्यतीत सहभागी बैलांना अमानुषपणे क्रूर वागणूक देऊन बैलांच्या तसेच शर्यत पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांच्या जीवितास धोका होईल. असे वर्तन केल्याचे आढळून आल्यावरून आयोजक वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान महाजन यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत.