टँकरने दिलेल्या धडकेत पाय गमावला ; जळगाव न्यायालयाचा निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील भुसावळ रस्त्यावर खेडी गावाबाहेर एका टँकरने दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा जबर अपघात झाला होता. या अपघातात विद्यार्थिनीचा उजवा पाय निकामी होऊन कापावा लागला होता. त्यामुळे जळगाव न्यायालयाने निकाल दिला. निकालात मुलीला ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
अयोध्या नगर येथील मानसी हेमंत पाटील ही १७ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी शाळेत सायकलने जात असतांना दि.१६ नोव्हेंबर २०१४ रोजी खेडी गावाच्या बाहेर, महामार्गावर तिला टँकर (एम. एच. ४३ यु. २१२४) ने धडक दिल्यामुळे मानसीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिला समर्थ हॉस्पिटल व डॉ. अर्जुन भंगाळे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले होते. पायाला अतिशय गंभीर दुखापत असल्यामुळे डॉक्टरांनी तिचा उजवा पाय गुडघ्याच्या वरून कापला होता व तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने औषधोपचार केले.
मानसीला दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांच्या मार्फत निष्काळजीपणे टँकर क्रमांक एम.एच.४३ यु. २१२४ चालविणारा चालक मोहम्मद तजुर अली नाजुर मोहम्मद रा. वडाळा, मुंबई तसेच सदर टँकर हे रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीकडे विमाकृत होते. या सर्वावर अपघातामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. याप्रकरणात न्या.बी.एस.वावरे यांनी सदर मुलीला विमा कंपनीने ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, असा निकाला दिला आहे. विद्यार्थिनीतर्फे ॲड. महेंद्र चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव यांनी काम पाहिले.