जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन मागे घेतले जावे यासाठी आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून मागण्यांबाबत तोडगा काढावा अशी विनंती प्राध्यापकांची संघटना एन-मूक्टोने प्रभारी कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांना पत्राद्वारे केली आहे.
गेल्या आठवड्यापासून विद्यापीठ परिसरात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरु आहे. त्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामकाज व प्रशासकीय बाबींवर होत आहे. त्यामुळे विविध महाविद्यालये, विद्यार्थी यांची प्रशासकीय कामे खोळंबली आहे. विद्यापीठात खान्देशातून अनेक किलोमीटर प्रवास करीत प्राचार्य, अधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक प्रशासकीय कामे घेऊन येत असतात. पण लेखणी बंद आंदोलनाने कामे होत नाहीत. हि बाब विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालणारी नाही.
या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून तोडगा काढावा, हे आंदोलन थांबून प्रशासकीय कामे लवकर सुरु व्हावी अशी विनंती एन- मूक्टोने केली आहे. विनंती पत्रावर एन-मूक्टोचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, सचिव प्रा. डॉ. जितेंद्र तलवारे यांच्या सह्या आहेत.