पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक त्या परवानग्या एकाच छताखाली प्राप्त व्हाव्यात म्हणून २१ कोटी रुपये एवढा निधी ‘उद्योग भवन’ साठी शासनाने मंजूर केला असून त्यात उद्योग व्यवसायाशी संबंधित आस्थापनाचे कार्यालय त्यात असतील. असे हे सुसज्ज उद्योग भवन येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असून जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना मराठवाडा व विदर्भाच्या धर्तीवर वीज आणि जीएसटी मध्ये सवलत मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
‘इग्नाइट महाराष्ट्र -२०२४’ ही जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, नव उद्योजक, उद्योगोत्सुकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली, त्याच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योग विभागाचे नाशिक विभागीय सहसंचालक सतीश शेळके, मैत्रीचे नोडल ऑफिसर उन्मेष महाजन यांच्यासह विविध बँकाचे व्यवस्थापक, उद्योजक उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी सांगितले की, चाळीसगाव, पाचोरा, व चोपडा येथील ग्रामीण भागातील सहकारी औद्योगिक वसाहतींना पायभूत सुविधासाठी ८ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी शासनाने दिला आहे. हे सांगून जिल्ह्यात किमान ४ ते ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनाच्या उद्योग विभागातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना शहरी व ग्रामीण भागातील नव उद्योजकांना भरीव अनुदान देण्यात येत असून यातून जिल्ह्यात दरवर्षी एक हजार नवीन उद्योगांची उभारणी होईल. ज्यातून जिल्ह्याला किमान ३ हजार युवकांना नवीन रोजगार निर्माण होतील, असा शासनाचा प्रयत्न असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
रात्री विमान उड्डाणासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक सोयीसाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला. त्यामुळे जळगाव वरून आता मुंबई, पुणे, हैद्राबाद, गोवा येथे विमान सेवा सुरु झाली असून उद्योजकांना उद्योगवाढीसाठी अत्यंत पूरक ठरत असल्याचे सांगून जिल्ह्यातील युवकांनी आता अधिकाधिक उद्योग उभारून रोजगार देणारे बनले पाहिजे त्यासाठी शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी, जिल्ह्याचे सकल उत्पन्न ( जीडीपी ) वाढीसाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यानंतर वेगवेगळ्या सत्रात ‘मैत्री’ चे नोडल ऑफिसर उन्मेष महाजन, आय.डी. बी. आयचे मिलिंद काळे, न्यू इंडिया इन्शुरन्सचे मुख्य व्यवस्थापक ( बिझनेस ) आनंद अमृतकर, पोस्ट विभागाचे सहायक अधिक्षक एम एस जगदाळे, सिद्धेश्वर मुंडे, कौशल्य विकास अधिकारी मिलिंद देशपांडे, पूजा पाटील यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले. जिल्हा उद्योग केंद्राचे मुख्य व्यवस्थापक चेतन पाटील यांनी आभार मानले.