मनमाड येथील बाजार समितीजवळ घटना
मनमाड (वृत्तसेवा) :- सोमवारी संध्याकाळी शाळेतून घरी परतत असताना भरधाव ट्रकने शाळेतील दोन मुलांना चिरडल्याची घटना घडली असून अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. सदरची घटना मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच घडल्याने अपघातानंतर नागरिकांनी लागलीच धाव घेत पोलिसांना पाचारण केले.
मनमाड- चांदवड रोडवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून या घटनेत वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. सकाळी दोघेजण शाळेत गेले होते. सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे यांना जबर धडक दिली.
धडक दिल्यानंतर दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक भरधाव वेगात असल्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. भीषण अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात नेले. दरम्यान अपघातानंतर ट्रक पुढे जाऊन नागरिकांनी अडविला. यानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र अपघात घडल्यानंतर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.