कारचा नियोजनबद्ध पाठलाग ; धागेदोरे मिळवताना स्थानिक गुन्हे शाखा ३ दिवस अक्षरशः राबली
जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापसाचे व्यापारी स्वप्नील शिंपी यांची हत्या करणारी हल्लेखोरांची ५ सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी पकडली आहे . स्वप्नील शिंपी आणि दिलीप चौधरी पैसे घेण्यासाठी आले तेंव्हापासून ही टोळी त्याच्या कारचा पाठलाग करत होती , असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे . या हत्याकांडाचे धागेदोरे मिळवताना .स्थानिक गुन्हे शाखा ३ दिवस अक्षरशः राबली आणि काल मध्य रात्री ही टोळी पकडली गेली .
यासंदर्भात पोलीस खात्याकडून पत्रपरिषदेत अधिकृत माहिती दिली जाणार आहे , असे सांगण्यात आले . खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , स्वप्नील शिंपी आणि दिलीप चौधरी हे दोघे पैसे घेण्यासाठी जळगावात आपल्यापासून ही टोळी त्यांच्या मागावर होती . टोळीतील १ जण या दोघांच्या बारीकसारीक हालचाली टिपून इतरांना मोबाईलवरून माहिती देत होता . पैसे घेऊन निघाल्यावर या दोघांची कार शहरातून जाणाऱ्या महामार्गाला लागल्यापासून बाकीच्यांनी मोटारसायकलींवरून त्यांचा पाठलाग सुरु केला होता
या हत्याकांडाचा तपास पोलिसांना आव्हान देणारा होता . त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने धीराने परिस्थिती हाताळली .पोलीस अधीक्षक डॉ प्रवीणकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अनुभवाच्या जोरावर सूत्रे फिरवत पूर्वीच्या एका गुन्हेगाराच्या नेटवर्कचा वापर केला त्यातून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस या टोळीपर्यंत पोहचले . हल्ला झाला तेंव्हा दिलीप चौधरीने कुणाचाच प्रतिकार केला नाही , तो बाजूला निघून गेला होता अशी माहिती समोर येत आहे . कारच्या डाव्या बाजूच्या दरवाजातून हल्लेखोरांनी स्वप्नील याला बाहेर खेचले होते . मात्र स्वप्नील पैशाची पिशवी सोडत नसल्याचे पाहून त्यांनी त्याच्यावर चॉपरने वार केले .
ही टोळी ६ आरोपींची असून सहावा फरार आहे , असेही या सूत्रांनी सांगितले . काल मध्यरात्री पोलिसांनी या पाचही आरोपींना त्यांच्या घरातून उचलून आणत अटक केली . या सर्व आरोपींवर आधीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवले गेलेले आहेत . ही सराईत गुन्हेगारांची टोळी आहे . पाचपैकी ३ जण शनिपेठ आणि २ जण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी आहेत आता स्थानिक गुन्हे शाखा या आरोपींकडून मिळणारी माहिती , त्यांच्याकडून सांगितला जाणारा घटनाक्रम आणि दिलीप चौधरींच्या हालचाली व घटनास्थळावरील भूमिकेचा खुलासा व्हावा म्हणून तपास करणार आहे . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा माग काढून राबवलेले हे अटकसत्र सगळे संशयित गुन्हेगार गाफील ठेऊन राबविल्याने हा तपास वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे .
एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापसाचे व्यापारी स्वप्नील शिंपी यांची हत्या त्यांचा कामगार मित्र दिलीप चौधरी यानेच सुपारी देऊन घडवून आणलेली आहे , असा संशय पत्रपरिषदेत त्यांचे वडील रत्नाकर शिंपी यांनी व्यक्त केला होता . अ भा क्षत्रीय अहिर शिंपी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या पत्रपरिषदेत अनेक अनुत्तरित प्रश्नांची जंत्री मांडण्यात आली होती .
त्यादिवशी या दोघांजवळ १५ लाख २८ हजार ४५० रुपये रोकड असलेली पिशवी होती . त्यांना आर क्रांती नावाच्या व्यापाऱ्याकडून ७ लाख ६० हजार रुपये आणि रजनीकांत नावाच्या व्यापाऱ्याकडून ७ लाख ६८ हजार ४५० रुपये मिळाले होते . आता त्या पिशवीत फक्त १० लाख २८ हजार ४५० रुपये शिल्लक दिसत आहेत , बाकीचे पाच लाख रुपये कुठे गेले हाही प्रश्न अनुत्तरित आहे . या प्रश्नाचे उत्तरही आता पोलिसांना शोधावे लागणार आहे
स्वप्नील त्या दिवशी कार चालवत होता तर मग त्याच्या शरीराच्या डाव्या भागावर वार कसे झाले ? या झटापटीत दिलीप चौधरी याने मारेकऱ्यांचा प्रतिकार का केला नाही ? त्याने प्रतिकार केला असता तर त्याला साधारण तरी जखमा झाल्या असत्या , त्याला साधे खरचटलेलेही दिसत नाही , असे का ? , हल्ला करून मारेकरी निघून गेल्यावर ड्रायव्हिंग येत असूनपण दिलीप रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ का घालवत बसला ? , तो आपल्याच कारमध्ये टाकून तात्काळ स्वप्नीलला रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता पण त्याने तसे का केले नाही ? हल्ला होत असताना मारेकऱ्यांच्या मोटारसायकलींचे क्रमांक टिपून घेणे किंवा फोटो काढणे दिलीपला का जमले नाही ? , अशा प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून मिळणार आहेत
पाळधी ( ता – एरंडोल ) येथील साईबाबा मंदिराजवळ अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील रहिवाशी कापूस व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला होता हे दोघे भागीदार होंडा सिटी कारने ( क्रमांक एम एच ०१ – ए एल ७१२७ ) जळगावला त्यांची रक्कम घेण्यासाठी आले होते जळगावला येऊन ते त्यांना मिळालेले व्यवसायातील जवळपास १० ते १५ लाख रुपये घेऊन माघारी गावी फरकांडे येथे त्यांच्या कारने निघाले होते .
पाळधीजवळ ते साईबाबा मंदिराजवळच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात ५ जणांच्या टोळक्याने शिंपी यांच्या होंडा सिटी कारला त्यांच्या मोटारसायकली आडव्या लावून कट का मारला म्हणून वाद घातला . कार चालवत असलेले स्वप्नील शिंपी यांना कारमधून खेचून या टोळक्याने बाहेर काढले त्यांच्या पाठीवर , मांडीवर शस्त्राने वार केले होते .