नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !
जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीला मोठा पूर आला आहे. तापी नदीचे उगमस्थान असलेल्या बैतुल जिल्ह्यामध्ये (मध्य प्रदेश) झालेल्या जोरदार पावसामुळे उगम क्षेत्रातून पाण्याचा मोठा प्रवाह येत असल्याने तापी नदीच्या जलस्तरात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील महत्त्वाच्या हातनूर धरणाचे तब्बल २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत.


धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, सध्या हतनूर धरणातून ४९,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सुरू आहे. धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने तापी नदीचे पात्र पूर्णपणे दुथडी भरून वाहत असून नदीला पुराचे रौद्र रूप प्राप्त झाले आहे. तापी नदीला आलेल्या या पुरामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच गुरेढोरे किंवा स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके तैनात करण्यात आली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.








