जीवनाचा इतिहास बदलवायचा असेल तर आधी मनाचा भूगोल बदलवावा लागतो. काया आणि मन यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. बंध आणि मोक्ष हे बाह्य परिस्थितीवर निर्भर नसते ते तर अंतर्मनावर अवलंबून असते. मनाची शक्ती अफाट आहे, मन विचार करते आणि प्रत्यक्ष कृती करण्याचे काम शरीर करत असते त्यामुळे तन आणि मन या दोहोंवर नियंत्रण मिळविले तर उत्तम असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.
राज्यात मन गुंतले होते बंध सुटत नव्हते परंतु मिथिला नगरी जळत होती त्यावेळी नमिराज यांचे बंध सुटले त्याबाबतची गोष्ट आपण अनेकदा ऐकलेली आहे. मनाचा घोडा अनियंत्रीत असतो तसे मन हे कल्पवृक्षाप्रमाणे देखील असते. मन विचार करते तसे घडते याबाबतची रुपकात्मग गोष्ट महाराज साहेबांनी सांगितली. एक वाटसरू जंगलात भटकतो. एका झाडाखाली तो विश्रांती घेण्याच्या हेतुने थांबतो. मनातल्या मनात विचार करतो तहान लागली आहे पाणी मिळाले तर किती छान होईल. मन एक एक इच्छा व्यक्त करते त्या पूर्ण होतात. मन विचार करते इथे भूत तर नाही ना… खरेच भूत प्रकट होते. ते समोर दिसल्यावर मन विचार करते ते मला खाणार तर नाही ना? आपल्या मनामुळेच एखाद्याचा घात होऊ शकतो. चलीत, अचलीत, चलीत-चलीत आणि अचलीत-अचलीत असे मनाचे चार प्रकार देखील महाराज साहेबांनी समजावून सांगितले. मनाला स्थिर करायचे असेल तर काया स्थिर व्हायला हवी. मनात विकार आले तर स्वाध्यायाच्या लेझरने ते स्वच्छ करायला हवे. मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी साधना महत्त्वाची असते असे सांगून येत्या रविवारी सामूहिक एकासना करण्याचे आवाहन ही करण्यात आले. परमपुज्य ऋजुप्रज्ञजी म.सा यांनी देखील कालच्या प्रवचनात घेतलेल्या अध्यायावर चर्चा केली.