चोपडा तालुक्यात चिंचाणे गावात प्रशासनाची हालचाल
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचाणे गावात शेत रस्ता मोकळा करून प्रशासनाने ६० ते ७० शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात आले आहे.
नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. त्याअतंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिक्रमित शेत पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी शंभर दिवसांची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत अनेक शेत शिवारातील रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. अशातच चोपडा तालुक्यातील चिंचाणे गावातील शेतकरी प्रज्वल पाटील यांच्या शिवारातील शेतरस्ता प्रशासनाच्या मदतीने मोकळा करण्यास आला आहे. शेतरस्ता मोकळा करण्यासंदर्भात पाटील यांनी मागील जनसंवाद कार्यक्रमात तक्रार दिली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, तहसिलदार चोपडा, मंडळ अधिकारी व तलाठी चिंचाणे यांच्या मदतीने पाटील यांचा शेतरस्ता मोकळा करण्यात आला आहे. शेतरस्ता मोकळा झाल्याने ६० ते ७० शेतक-यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत जिल्हाधिका-यांचे व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे.