जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी केले आहे.
सामूहिक/नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी/शेतमजूर कुटूंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. १० हजार एवढे अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे रुपये २ हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते. वधू जळगाव जिल्ह्याची स्थानिक रहिवाशी असावी, शेतकरी असल्यास ७/१२ चा उतारा व शेत मजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला, वधूच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखपेक्षा जास्त असू नये त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सोबत जोडावा. या योजनेचा लाभ खुला व इतर मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी देण्यात येतो.
या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दाम्पत्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत असल्याने ते पात्र राहणार नाही. सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जावून नोंदणीकृत विवाह करणारे जोडपे, बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात रुपये 20/- च्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकाऱ्याच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. नोंदणीकृत एका स्वंयसेवी सस्थेस एका सोहळ्यात किमान ५ व कमाल १०० जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहिल.
अधिक माहितीकरीता जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव, आकाशवाणीजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२२८८२८ वर संपर्क साधावा असे सोनगत यांनी कळविले आहे.