धरणगाव तालुक्यात झुरखेडा येथे शेकडो लाभार्थ्यांना ३५ योजनांचे थेट लाभ
जळगाव ( प्रतिनिधी ) – समाधान शिबिरं ही केवळ औपचारिकता नाहीत, तर ती आपल्या लोकांच्या हक्काच्या अधिकारांची वाटचाल आहे. आता शासन तुमच्या दारी नव्हे, तर शेतकऱ्यांसह सर्व सामान्याच्या पाठीशी भक्कम उभे आहे. प्रत्येक सर्कलमध्ये दर महिन्याला एकदा म्हणजे वर्षातून किमान चार वेळा अशी शिबिरे भरवली जातील. पद्मालय सिंचन योजनेतील सातबारा उताऱ्यावरील शिक्के तातडीने मुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश देत महसूल, कृषी, शिक्षण, महिला-बालविकास कुठलाही विभाग असो, नागरिकाला समाधान मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही, प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावरचे दिसणारे समाधान हेच या शिबिरांचे खरे यश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात 35 विविध योजनांचे लाभ शेकडो लाभार्थ्यांना थेट वाटप
जातीचे प्रमाणपत्र 18, उत्पन्न दाखले – 91, नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र – 24, संगयो+इंगायो प्रकाराने – 37, DBT करणे 171, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना – 03, ई रेशनकार्ड – 39, जिवंत 7/12 उतारे – 98, ई के वाय सी – 57, तुकडा शेरा कमी करणे – 180, नाचणी बियाणे वाटप, बेबी केअर कीट, शालेय गणवेश व दप्तर तसेच महिला बचत गटांना उमेद अभियान अंतर्गत मुक्ताई महिला बचत गटाला 6 लाखाचे एचडीएफसी बँक मार्फत मान्यता आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, गट शिक्षणाधिकारी वंदना भोसले, तालुका कृषी अधिकारी देसले, गणेश पाटील, विविध विभागांचे अधिकारी सरपंच, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी शिबिराचे स्वरूप व लाभ स्पष्ट केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले, तर आभार नायब तहसीलदार लक्ष्मन सातपुते यांनी मानले. शिबिरात वारस नोंदी, रेशन कार्ड, जात व उत्पन्न दाखले यांसारखी विविध कामे तात्काळ मार्गी लावण्यात आली.