आत्मशुद्धतेसाठी लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य हे मार्ग महत्त्वाचे असून दुसऱ्यांविषयी सेवा परोपकाराची भावना ठेवली पाहिजे. एखाद्या कपड्यावर डाग पडले तर ते साफ करता येतात. मात्र चारित्र्यावर पडलेला डाग कितीही प्रयत्न केले तर साफ होत नाही. त्यामुळे सज्जन माणसाने डोळ्यात लज्जा व हृदयामध्ये दुसऱ्यांविषयी दया भाव ठेवावा. अहिंसा, विनय हे धर्माचे मुळ मानले जातात त्याचप्रमाणे दया सुद्धा महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांचे दु:ख, पिडा आपली स्वत:ची समजून त्यावर विधायक कृती म्हणजे दया होय. त्यात संवेदना असते. सम, सम्मेख, अनुकंप म्हणजे दया होय. स्नेही, स्वजनांना आपत्ती किंवा एखाद्या रोगाने ग्रस्त केले असेल, तर त्यांच्याविषयी दया ठेवणे म्हणजे सेवा नसून सर्व जीवांविषयी काळजी घेणे म्हणजे सेवा होय. ज्यांच्या विषयी घृणा केली जाते त्यांच्या विषयीसुद्धा दया दाखवा. ज्याठिकाणी दया ही संवेदना निर्माण होते. त्यानंतरच सेवा भावना मनात जागृत होते. आंतरीक भावना दृढ झाल्यानंतरच सेवा घडते. सहकार्य, सेवा केल्याचा जो आनंद मिळतो तो परमार्थाचे दर्शन घडवितो. त्यासाठी आपल्याजवळ जे आहे, आपल्याकडून जे शक्य आहे त्याप्रकारे दुसऱ्यांविषयी दया, सेवा भाव ठेवा. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा हे वृद्धिंगत करत रहा, यातूनच सज्जनशिलता मनुष्यात विकसीत होत राहते. असे उपदेशपर मार्गदर्शन शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकांना केले.
सर्व धर्मांमध्ये हिंसेला कुठलेली स्थान नाही अहिंसा, तप, संयम हे प्रत्येक धर्माचे मूळ आहे. अहिंसा परमोधर्म या भावनेतून कृती केली पाहिजे. जे ज्ञान हिंसेला खतपाणी घालते ते ज्ञान काहीही कामाचे नाही. जिथे हिंसा आहे तो धर्म नाही त्यामुळे अहिंसा धर्माचे पालन करणारे खऱ्या अर्थाने संतश्रेष्ठ आहेत. असे विचार आरंभी परमपूज्य श्री. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले.