रावेर तालुक्यात सुकी नदीत घडली घटना
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाल येथील सुकी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या एका इसमाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २० जून रोजी उघडकीस आली. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बिलराम केकड्या भिलाला (वय ४६, रा. पाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बिलराम भिलाला हे दररोजप्रमाणे गुरुवारी सकाळी मासेमारीसाठी सुकी नदीकाठी गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली.(केसीएन)शोधादरम्यान नदीकाठी त्यांचे कपडे, बूट, मासेमारीचे जाळे आणि साहित्य आढळून आल्याने त्यांच्यासोबत काही अनर्थ घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शोधमोहीम रात्रभर सुरू राहिली. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाल पोलीस चौकीचे पोलीस हवालदार जगदीश पाटील आणि कोतवाल आमीन तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे पाल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिलराम भिलाला हे मासेमारी आणि मजुरी करून वयोवृद्ध आई-वडील आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्याच उत्पन्नावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असल्याने अचानक घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनं कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. शासनाने दखल घेऊन भिलाला कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.