जळगांव (प्रतिनिधी) – बालवयातील दुर्मिळ आणि जीवघेणा समजला जाणारा प्रेस सिंड्रोम या आजाराने त्रस्त असलेल्या एका सहा वर्षांच्या बालकावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथील बालरोग तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचवले. ही वैद्यकीय कामगिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे.
चोपडा येथील मुर्तुझा शेख (वय १०) बालक अत्यवस्थ स्थितीत रूग्णालयात दाखल झाला होता. त्याला सतत झटके येत होते, तसेच संपूर्ण शरीराला सूज आली होती. रक्तदाब खूप वाढलेला होता, श्वास घेण्यात अडचण होती आणि काही वेळा शुद्धही हरपत होती. त्याचबरोबर किडनीच्या कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत लगेचच त्याला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
तज्ज्ञांच्या टीमकडून उपचार
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्या नेतृत्वाखालील टीमने तातडीने उपचार सुरू केले. सर्वप्रथम बालकाची एमआरआय चाचणी करण्यात आली. यामध्ये मेंदूतील सूज स्पष्टपणे दिसून आली. यासोबतच विविध रक्ताच्या तपासण्या केल्या असता किडनी निकामी होण्याच्या लक्षणांची पुष्टी झाली. त्यातूनच प्रेस सिंड्रोम हा निदान झाला. प्रेस सिंड्रोम हा मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील दबाव वाढल्यामुळे होणारा आजार असून, यामध्ये मेंदूत सूज येते, जे झटके, शुद्ध हरपणे, भ्रम, दृष्टिदोष, तसेच इतर अनेक न्यूरोलॉजिकल त्रास निर्माण करू शकतो. हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होते कारण मुलाला किडनीचा आजार देखील होता, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवणे अत्यंत अवघड झाले होते.रूग्णालयातील डॉक्टरांनी औषधोपचारासोबतच आवश्यक असलेली द्रव आहार व्यवस्थापन, अँटी-एपिलेप्टिक औषधे, आणि विशेष पद्धतीने रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे दिली. सातत्याने एमआरआय व इतर तपासण्या करून मेंदूतील सूज कमी होण्यावर निरीक्षण ठेवण्यात आले.सुमारे आठ दिवसांच्या उपचारांनंतर बालकाची स्थिती सुधारू लागली. झटके पूर्णपणे बंद झाले, सूज कमी झाली, आणि शुद्ध परत आली. या यशस्वी उपचारासाठी डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. कुशल धांडे, डॉ. निरज जगताप, डॉ. अभिजीत अरमाड व परिचारीकांनी सहकार्य केले.
लहान मुलांना अचानक झटके, शुद्ध हरपणे, सुज येणे, अशक्तपणा अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रेस सिंड्रोम हा आजार वेळेत ओळखल्यास उपचारक्षम असतो, पण उशीर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
– डॉ. चंदाराणी देगूलरकर, निवासी डॉक्टर