धुळे तालुक्यात अपघात, भडगाव तालुक्यातील सावदे येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील सावदे येथील शेतकरी व त्यांच्या पत्नी तथा गावच्या पोलीस पाटील हे धुळे येथे रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी मुलीला भेटण्यास गेले होते. भेट घेऊन परतत असताना शेतकरी पती शिवाजी नारायण पाटील यांनी पत्नीला गावच्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर भडगावी दुचाकीने येत असताना त्यांचा धुळे तालुक्यात फागणे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शिवाजी नारायण पाटील (देसले, वय ५०, रा. सावदे ता. भडगाव) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते सावदे गावात पत्नी, भाऊ, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. आदर्श शेतकरी म्हणून त्यांचा सावदे गावात लौकिक होता. तर त्यांच्या पत्नी छायाबाई शिवाजी देसले पाटील या गावच्या पोलीस पाटील आहेत. आज दि. २५ ऑगस्ट रविवार रोजी शिवाजी नारायण पाटील धुळे येथे मुलीला भेटण्यासाठी पत्नीसह गेले होते. (केसीएन)तेथून परतीच्या प्रवासासाठी निघाले. मात्र पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्यांनी पत्नी छायाबाई यांना गावाच्या बसमध्ये बसविले. स्वतः शिवाजी पाटील हे काळ्या रंगाच्या प्लॅटिना या दुचाकीने भडगावच्या दिशेने निघाले.
आज रविवार रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी पाटील यांची दुचाकी धुळेजवळील फागणे गावाजवळील पुलाजवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला आहे. (केसीएन)ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ धुळे येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दुसरीकडे त्यांच्या परिवाराला माहिती मिळताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यांचा मृतदेह भडगाव तालुक्यातील सावदे या गावी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आणण्यात आला. तेव्हा गावकऱ्यांनी गर्दी केली होती. मनमिळावू, आदर्श शेतकरीचा अकाली मृत्यू झाल्याने भडगाव तालुका व परिसरात शोककळा पसरली आहे.