महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते सत्कार
जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानात ६६ टक्के सूट मिळविण्याच्या संधीचा लाभ घेत सावदा येथे १३ शेतकऱ्यांनी गुरुवारी २४ लाखांचे वीजबिल भरून थकबाकीतून मुक्त होण्याचा मान मिळविला. महावितरणचे प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसाद रेशमे यांनी जळगाव, नशिराबाद, भुसावळ, मुक्ताईनगर, सावदा येथे भेट देऊन थकबाकी वसुलीसह कामकाजाचा आढावा घेतला. कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी महाकृषी ऊर्जा अभियानातून उपलब्ध आहे. या योजनेत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करून बिल भरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
त्यानंतर रावेर व यावल तालुक्यातील १३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २४ लाख रुपयांचे वीजबिल भरले . अनिता चौधरी, विलास चौधरी, यादवराव पाटील, लक्ष्मण चौधरी, बाबुलाल गुप्ता, हिरामण बोंडे, गोविंदा इंगळे, गुणवंत नेमाडे, संजय पाटील, कविता राणे, भगवान पाटील, पंडितराव चौधरी व डिगंबर पाटील अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उपविभागीय व कक्ष अभियंत्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसाद .रेशमे म्हणाले की, कृषिपंप वीजबिलांच्या वसुलीतून ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे.
महावितरणची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता वीजबिलांच्या थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नाही. प्रत्येक युनिटच्या वसुलीसाठी प्रयत्न करावे, असे निर्देश रेशमे यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.