औरंगाबाद (वृत्तसंस्था) – औरंगाबादमधील करमाड जवळ शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. पहाटे ५.१५ च्या सुमारास रिकाम्या मालगाडीने काही लोकांना जालना-औरंगाबाद दरम्यान उडवले. यात स्थलांतरीत १४ मजूर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेऊन यावर पुढील उपाययोजना करण्यात येतील. अशी माहिती नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान मोटारमनने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा वेग अधिक असल्याने गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.
जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे १९ मजूर औरंगाबादहून घरी जाण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्व रेल्वे रुळावर झोपले होते. झोपतेच त्यांना मालगाडीने उडवले. यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबाद सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक ठप्प होती. त्यामुळे बेरोजगार झालेले अनेक मजूर गावी पायीच निघाले. रात्रीच्या वेळेस त्यांनी रेल्वे रुळावर विश्रांती घेतील आणि त्यांच्यावर काळाचा घाला झाला. यापूर्वीही अनेक मजूर जीवावर उदार होत हजारो किलोमीटरचा प्रवास मिळेल त्या मार्गाने करत असल्याचे समोर आले आहे. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.