मुंबई (वृत्तसंस्था) – प्रशासनाचा आदेश डावलून वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील जोतिबा यात्रेसाठी काही ग्रामस्थ निघाले होते. पाडळी( ता.सातारा) येथील पाच ग्रामस्थांसह अज्ञात 30 ते 40 ग्रामस्थांवर बोरगाव पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक जगन्नाथ ढाणे (वय.50), संतोष महादेव ढाणे (वय.40),कालिदास सदाशिव गुरव (वय.60), बाळासो दत्तात्रेय गुरव (वय.60), भूषण भीमराव ढाणे (वय 30) अशी गुन्हे दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना विषाणू रोगप्रसार रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम व गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व यात्रा व जत्रा ही रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातीलही सर्व यात्रा रद्द केल्या असून त्यामध्ये वाडी रत्नागिरी येथील जोतिबा यात्रेचाही समावेश आहे. तरीही पाडळी (ता .सातारा ) येथील काही ग्रामस्थ वाडी रत्नागिरी येथील जोतिबा यात्रेस जाण्यासाठी चौकात एकत्र जमले असल्याची माहिती सपोनि चंद्रकांत माळी यांना समजल्यावर त्यांनी हवालदार विशाल जाधव, राजू शिखरे, स्वप्नील माने व चालक धनंजय जाधव यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गावातील मुख्य चौकात ग्रामस्थ बैलगाड्या सजवून मोठ्या संख्येने जमाव जमवून यात्रेस निघण्याच्या तयारीत होते.पोलिसांना पहाताच काही ग्रामस्थानी तेथून पलायन केले. या वेळी पोलिसांनी अशोक ढाणे,संतोष ढाणे,कालिदास गुरव,बाळासो गुरव व भूषण ढाणे यांच्यासह 30 ते 40 ग्रामस्थांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269 मुंबई पोलीस अधिनियम 135 व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.पुढील तपास हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.