उद्या पासून शहरातील सर्व भागात भाजीपाला विक्रेते…
अमळनेर ( प्रतिनिधी) कोरोनाची भयावह साथ रोखण्यासाठी देशव्यापी ‘लाॅक डाऊन’ असतानाही लोक खरेदी निमित्ताने रस्त्यावर गर्दी करून दिसताहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ‘सोशल डिस्टन्स्’ साठी आज अमळनेर येथे नगर पालिकेमार्फेत भाजी मंडई, गंगा घाट, लालबाग शाॅपिंग व इतर मार्केटिंग भागात बॅरेकेट लावण्यात आले.
यावेळी न.पा.मुख्याधिकारी डाॅ. विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, अरविंद कदम, वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव, संजय चौधरी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
बॅरेकेट लागल्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने नागरिकांची व भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी कमी करण्यात आली.
यानंतर मुख्याधिकारी डाॅ. विद्या गायकवाड यांनी नागरिकांना विनंती व आवाहन केले आहे की, कोरोना महामारीचा प्रार्दूभाव थोपवण्यासाठी नपा अनेक उपाययोजना करीत आहे परंतू रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही आहे. नागरिकांनी अत्यावश्यक खरेदीसाठीच घराबाहेर पडावे. फक्त रिकामे फिरायला, शहरात काय चालू आहे, कर्मचारी व पोलीस कसे काय काम करताहेत हे पाहण्यासाठी कृपया घरातून बाहेर पङू नये. आज बॅरेकेट लावण्यात येऊन बाजारपेठ भागात वाहनांना बंदी केली आहे जेणेकरुन गर्दी होऊ नये. नागरिकांनी न.पा.ला, कर्मचार्यांना, पोलिसांना सहकार्य करावे म्हणजे कामाशिवाय घराबाहेर पडू नये. या महामारीला आपण एक होऊन भारतातून नष्ट करुया.
आज दुपारी नपा मुख्याधिकारी दालनात आडत असोसिएशन, भाजीपाला युनियन यांची बैठक झाली. या बैठकीला जेष्ठ सामाजिक नेते रामभाऊ संदानशिव, काँग्रेस तालुका अध्यक्ष गोकूळ बोरसे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, प्रकाश महाजन, राहुल महाजन, नपा अधिकारी, कर्मचारी व विक्रेते उपस्थित होते. बैठकीत असे ठरले की, उद्या पासून शेतकरी परस्पर भाजीपाला विक्रेत्यांना आपला माल विकतील. भाजीपाला विक्रेते शहरातील विविध ठिकाणी तसेच अन्य भागात, काॅलनीत लोटगाडीने किंवा फिरुन विक्री करतील. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागात भाजीपाला व फळे मिळणार आहे.