चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यात पंचनामे करण्याच्या औपचारिक कामात वेळ न घालवता अतिवृष्टीग्रस्तांना पिकपेरानिहाय सरसकट मदत जाहीर करा अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य सरकारकडे केली आहे

५ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यावरील आभाळ प्रकोपाचे सावट अधिक गडद झाले आहे. मंगळवारी पहाटे तितूर व डोंगरी नदीला पाचव्यांदा पुर आला दुकानांमध्ये पाणी घुसले. ढगफुटीसदृश्य पाऊस व चक्रीवादळाचा मोठा तडाखा तालुक्याला बसत असून गत २४ तासात ४४५ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे उरल्या – सुरल्या खरीप पिकांचा चिखल झाला आहे.
नुकसानीमुळे शेतक-यांच्या डोळ्यातूनही अश्रूंचा पूर वाहू लागला आहे. तालुक्यात मंगळवार अखेर ११०२.१३ मि मी पर्जन्यमान झाले आहे. सातही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन चाळीसगाव तालुक्यातील भयावह परिस्थितीची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह पाचोरा, भडगाव व औरन्गाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीची व शेती पिकांची हानी झाली होती. हजारो हेक्टर जमीनी महापुरात खरडून गेल्या. चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावांना शेतामध्ये पाणी तुंबून हातातोंडाशी आलेले कपाशी, ऊस, मका, ज्वारी – बाजरी आदी सर्वच पिके खराब झाली आहेत.
आधीच कापसावर लाल्यारोग व बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यात ५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कापसाची पूर्णपणे नासाडी होत आहे.
या अगोदरच उशिराने झालेले पावसाचे आगमन, सारखी पावसाची रिप-रिप, मुसळधार पावसासह वादळ, कोरोना काळ यामुळे बळीराजा चारही बाजूंनी होरपळला गेलेला आहे. कापसासह ज्वारी व मका या पिकांवरदेखील अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे.







