सातारा (वृत्तसंस्था) – करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 लागू केले असल्यामुळे चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई असतानाही मेहर देशमुख काॅलनीतील एका इमारतीच्या टेरेसवर नमाज पठण करणार्या दहाजणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार अनेक उपाय करत आहे. त्यापैकी एक म्हणजे सोशल डिस्टन्स. त्यासाठी देशभरात कलम 144 लागू करण्यात आले. ज्यामुळे लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. मात्र, या आदेशाचा भंग करुन करंजे येथील मेहर देशमुख काॅलनीतील एका इमारतीच्या टेरेसवर काही लोक नमाज पठण करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई करुन दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.