भाजप पदाधिकाऱ्यांची माहिती
भुसावळ (प्रतिनिधी) : नेपाळमधील काठमांडू परिसरात दिनांक २३ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण बस दुर्घटनेमधील जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. हा अपघात झाल्यानंतर प्रशांत पाटील, अतुल झांबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, परिक्षित बऱ्हाटे हे काठमांडूला ठाण मांडून आहेत. काठमांडू येथील दवाखान्यामध्ये सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील बहुसंख्य जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
नातेवाईकांनी कोणतीही चिंता करू नये, असे त्यांनी सांगितले. प्रकृती सुधारल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्याशी संपर्क साधून विशेष विमानाने जखमींनाही जळगाव येथे आणले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काठमांडू येथे या अपघातातील जखमी झालेल्या निर्मला भिरूड, सीमा इंगळे, रेखा प्रकाश कोळी, हेमराज राजाराम सरोदे, रूपाली हेमराज सरोदे, भारती पाटील, शारदा सुनील पाटील, कुमुदिनी झांबरे, ज्ञानेश्वर बोंडे, आशा बोंडे, आशा पांडुरंग पाटील, सुनील धांडे, वर्षा पंकज भंगाळे, प्रवीण पांडुरंग पाटील, अविनाश भागवत पाटील, अनंत इंगळे यांच्यावर काठमांडूत उपचार सुरु आहेत.
वरणगाव येथे रविवारीही वातावरण सुन्न झालेले असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुकाने उघडली असून रविवार सुटी असूनही दुकानात ग्राहक नव्हते. तर चौकाचौकात निरव शांतता होती. ही घटना पूर्ण गावकऱ्यांसाठी चटका लावून गेली आहे.
या अपघातातील बसचालक मुस्तुफा खान आणि क्लिनर रामजित यांचे मृतदेह गोरखपूर येथे पाठवण्यात आले आहेत. तर उर्वरित २५ मृतदेह जळगाव येथे आल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या गावात रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख व्यक्त केले आहे. तर भारतीय दूतावासाकडून बाधितांना शक्य ती सर्व मदत करत असल्याचे म्हटले आहे. तसेच दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये देण्याचे ट्वीट पीएमओ इंडिया कार्यालयाने केले आहे.