वरणगावच्या जावळे दांपत्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का
जळगाव (प्रतिनिधी) : नेपाळ येथे झालेल्या बस दुर्घटनेत वरणगावच्या जावळे वाड्यातील माजी नगरसेवक सुधाकर जावळे, त्यांची पत्नी व त्यांच्या परिवारातील दोघांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मुलाला शुभमला अश्रू आवरेना झाले आहे. काल रात्री वडील पोखराला पोहचले होते. त्यामुळे त्यांचा रात्री ७ वाजेच्या सुमारास फोन आला, सकाळी काठमांडूला जावून पशुपतीनाथांचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले. आई बाहेर असल्याने तिच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. सकाळी काठमांडूला पोहचल्यानंतर त्यांना फोन करणार होतो, मात्र त्या आधीच त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असे सुधाकर जावळे यांचे पुत्र शुभम जावळे याने सांगितले.
शुभमने अपघातात आपल्या आई-वडिलांसह काकू व चुलत भावाला गमावले. दिनांक १६ ऑगस्ट रोजी शुभम आपल्या आई वडिलांना सोडायला भुसावळ रेल्वे स्टेशनला गेला होता. आई वडील हे उत्तर प्रदेश व नेपाळला जात असल्याने कुटुंबातील सर्वजण आनंदात होते. उत्तर प्रदेशातील अयोध्या, बनारस व प्रयागराज येथील दर्शन घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच नेपाळला पोहचले होते. पोखरा येथे हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास शुभमला वडिलांचा फोन आला. उद्या सकाळी पशुपतीनाथ यांचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आई बाहेर असल्याने शुभमचे आई रोहिणी जावळे यांच्याशी बोलणं होऊ शकले नाही.
आई सोबत मंगळवारी बोलणं झालं, तेच बोलणं शुभमसाठी शेवटचं ठरलं. सुधाकर जावळे यांनी बुधवारी वरणगाव मधील काही कार्यकर्त्यांशी रात्री फोनवरून संवाद साधला होता. शुक्रवारी दर्शन घेणार असल्याने दर्शन झाल्यानंतर त्यांना फोन करणार होतो, मात्र त्यापूर्वीच अपघात झाल्याची बातमी आल्याने शुभमला मोठा धक्का बसला. माहिती पसरताच जावळे वाडा शोकमग्न झाला.