सांगली (वृत्तसंस्था) – राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील देखील कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. याच पार्शवभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. आपण गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
‘आपल्याला कोरोना होणारच नाही असं डोक्यात ठेवून काही जण गर्दी करत आहेत. त्यामुळे रोगाचा फैलाव वाढत आहे. आपल्या जिवाला जपा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे मात्र त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे सहकार्य अपेक्षित आहे’.
‘परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही तर आम्हाला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल. त्याने कारखाने बंद होतील, रोजगार जाईल, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची अडचण होईल, आर्थिक फटका बसेल त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्या’! त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.