मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले २-३ महिने सर्व सण उत्सव लोकांनी घरातच साजरे केले आहेत. त्यामुळे यावेळी बकरी ईद देखील मुस्लिम बांधवांनी सावधपणे साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असे आवाहन केले आहे. बकरी ईद साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहे.
काय आहेत सूचना?
१- कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
४. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
६. कोविड – १९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.