नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारताने सन 2005-6 ते 2015- 16 या दहा वर्षाच्या काळात देशातील गरिबी निर्मूलन कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली असून या कालावधीत देशातील तब्बल 27 कोटी 30 लाख लोक दारिद्य्राच्या बाहेर येऊ शकले आहेत अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात देण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांची यूएनडीपी संस्था आणि ऑक्स्फर्ड पॉवर्टी ऍन्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वरील नमूद केलेल्या काळात भारताने उपेक्षित वर्गातील अनेक प्रकारच्या समस्या दूर केल्या आहेत.
आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा, कामाची खालावलेली स्थिती, हिंसेचा सामना करावा लागणे, अशा साऱ्या निकषातून भारताने वर नमूद केलेल्या काळात या उपेक्षित वर्गाला बाहेर यशस्वीपणे बाहेर काढले आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मल्टी डायमेंशनल पॉवर्टी निर्देशांक या तत्त्वाने या समित्यांनी 65 देशांतील गरिबांच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यात भारताची ही कामगिरी सरस ठरली आहे.
या काळात भारतातील तब्बल 27 कोटी 30 लाख लोक गरिबी रेषेच्या बाहेर येऊ शकले, असेही यात नमूद करण्यात आले आहे. भारताबरोबरच आर्मेनिया, निकारागुआ, नॉर्थ मॅकेडोनिया, या देशांनीही गरिबांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यात लक्षणीय कामगिरी केली. पण भारताने 27 कोटींपेक्षा अधिक लोकांचे जीवनमान सुधारून मोठी कामगिरी केली आहे. भारत आणि निकारागुआ या देशांनी बालकांच्या स्थितीतही या काळात चांगली सुधारणा घडवून आणली असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.