जामनेर तालुक्यातील गोद्री येथील घटना ; संतप्त जमावाचा महिलेच्या सासरच्यांना मारहाणीचा प्रयत्न
जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील खूनांचें सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी आज मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
काजल विशाल चव्हाण (वय २४, रा. गोद्रि ता. जामनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती गावांमध्ये पती विशाल, सासू-सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे.(केसीएन)दरम्यान गेल्या १ महिन्यापासून दोघं पती-पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता. मात्र रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला.
त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर, दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली. या मारहाणीमध्ये काजल ही जागीच गंभीर जखमी झाली. दरम्यान ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. यावेळी काजोलचा नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच पती विशाल याला ताब्यात घेतले. दरम्यान सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काजलचे माहेरचे मंडळी संतप्त झालेले होते.(केसीएन)त्यांनी सासरच्या मंडळींना आणि पती विशालला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.