व्यावसायिकाला अडवून रोकड हिसकावली; वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
यावल (प्रतिनिधी) : शहरात भररस्त्यात एका व्यावसायिकाला अडवून त्याच्या खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १९ मे) रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी संशयित दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती संबंधित व्यावसायिकाने दिली असून घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

भुसावळ रोडवरील हॉटेल चंद्रलोक परिसरात रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. फिर्यादी व्यावसायिक पायदळ जात असताना तीन ते चार जणांनी त्याला अडवून जबरदस्तीने खिशातील रोकड काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर संबंधित व्यावसायिकाने तातडीने यावल पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी तोंडी स्वरूपात तक्रार नोंदवून तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत असून, तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणात अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे का, मुद्देमाल हस्तगत झाला आहे का, तसेच पुढील कारवाईची नेमकी स्थिती काय आहे याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. २१ मे) या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी यावल पोलीस ठाण्यात गेलेल्या नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाणे अंमलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या काही दिवसांत यावल शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. बसस्थानक परिसरातून सोन्याची पोत चोरीला जाणे, फोटोग्राफरला अडवून मारहाण करून साहित्य चोरी करणे, तसेच आयशानगर भागातील घरफोडी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
या पार्श्वभूमीवर यावल पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण आहे का, गुन्हेगारीवर पोलिसांचा प्रभावी अंकुश आहे की नाही, तसेच काही घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे का, याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र या सर्व बाबींवर अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर, जलद आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









