पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
महेश पाटील
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. तालुक्यात बहाळ, टेकवाडेखुर्द, बु., वाडे शिवारातील केळी पिके व मका पिकांना विजेअभावी मोठा फटका बसत आहे. लोडशेडींगमुळे शेतकरी हैराण झाला आहे. थ्री फेज वीज ८ तास नावालाच शेतकऱ्याला मिळते.
प्रत्यक्षात दिवसभर तासाभरात अनेकदा विजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच काही दिवसापासून वातावरण पावसाचे तसेच सुसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी शेत शिवारात वीज वाहक तारा तुटून विजपुरवठा ४८ तासापासून खंडित आहे. बहाळ पॉवर हाऊस व खडकी, चाळीसगाव मेन पॉवर हाऊसवरून पण विजपुरवठा खंडित होत आहे. लोड खुप आहे असे कारण देऊन शेतकऱ्यांना गप्प करण्यात येते. शेतकरी हैराण झाला आहे. पाणी असून खंडित वीज पुरवठा यामुळे शेतकरी हैराण झालाय. आता मका, बाजरी, केळी पीक कशी जतन होतील हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. आ. मंगेश चव्हाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.