कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला
स्वातंत्र्यदिनी महिलांचा आक्रमक पवित्रा; किमान सहा दिवसांआड पाणीपुरवठ्याची मागणी
जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, मिळणारे पाणीही दूषित असल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी आज, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आक्रमक पवित्रा घेत अजिंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली.



कुसुंबा ग्रामपंचायतीकडून १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मिळणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने अखेर महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनकर्त्या महिलांनी ग्रामपंचायतीने किमान सहा दिवसांआड नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी केली. पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न असून, त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनी पाणीप्रश्नावर आंदोलन सुरू असताना ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आल्याने महिलांचा संताप आणखी वाढला. आपल्या समस्यांचे निवेदन कोणाकडे द्यायचे, असा सवाल करीत महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
रास्तारोकोमुळे अजिंठा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक महिलांशी चर्चा केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.








